Monday, 23 November 2015


उद्या लग्न आहे



अरुण सदाशिव मोहरीर


_____________________




लग्नापूर्वी

श्री अरुण मोहरीरांच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची ही काव्यरूप कथा. 'उद्या लग्न आहे' ही एक दीर्घकविताच आहे. ही कथा प्रथम व्यक्त झाली ती सादरीकरणाच्या पातळीवर. तिच्या अभिवाचनाचे काही प्रयोग होऊन त्या दीर्घकवितेत अंतर्भूत लय, सौंदर्याच्या स्रोतात ते वाचन झाले आणि त्यातील काव्यगुणांचा प्रत्यय आला. अशा काही प्रायोगिक वाचनानंतर आता हे लग्न पुस्तकरूपाने रसिकांसमोर येत आहे.

या दीर्घकवितेला एक संविधानक आहे; पण कथेला जसा 'मग काय झालं' चा अंतर्गत रेटा असतो, त्या अर्थानं ही कथा नाही, तर एका पित्याच्या उरीचा हा सहज स्वाभाविक असा पाझर आहे. तो व्यक्त होतांना त्याला निर्मितीचे, सृजनाचे पंख लाभलेत. मग त्या कवितेची सगळी भाषा ही एका सृजनाची भाषा झाली.

आधुनिक मराठी कवितेत दीर्घकविता, दीर्घकवितामालिका, खंडकाव्य या सारखी फार समर्थ परंपरा आहे. कविवर्य वसंत बापट यांच्या 'मानसी', 'राजसी' या दीर्घकवितामालिका, सुलभा हेर्लेकर यांची 'सई' ही देखील अशी दीर्घकवितामालिकाच आहे. कविवर्य ना. घ. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, आणि जुन्या कवितेतले बालकवी, राम गणेश गडकरी यांच्या दीर्घकविताही या संदर्भात पुढे येतात. या सर्वांत श्री अरुण मोहरीरांच्या या दीर्घकवितेचे नाते जुळते ते वसंत बापटांच्या 'मानसी'शी आणि सुलभा हेर्लेकरांच्या 'सई'शी. मानसी आणि सई सारखाच इथेही स्वतःशी चाललेला अंतर्गत असा ह्रद्य, उत्कट संवाद आहे. शिवाय गडकऱ्यांच्या 'राजहंस माझा निजला' किंवा नाघंच्या 'कंचनीचा महाल' व गदिमांच्या 'जोगिया' सारखे कथानकही यात आहे. पण कथेच्या संदर्भात या 'उद्याच्या लग्नाचे' धागे अधिक जुळतात ते बालकवींच्या 'फुलराणी'शी. तरीही 'उद्या लग्न आहे' ही दीर्घकविता ज्या स्वतःच्या शैलीचा मूलकंद घेऊन आलीय ती, आशयाच्या व अभिव्यक्तीच्या पातळीवर तिच्या स्वतःसारखीच म्हणावी लागेल. कवी म्हणून त्यांना तशी काही पूर्वपीठिका नसावी. ते केमिकल इंजिनियरिंगचे पीएच. डी. असून पवई आय. आय. टी. ला शिकवितात. तरीही त्यांच्या दीर्घकवितेचे अंतर्गत स्रोताच्या व काव्यकथेच्याही अंगाने आधीच्या कविपरंपरेशी धागे विणलेले दिसतात.

'उद्या लग्न आहे' यातील महत्त्वाचा शब्द 'लग्न' आहे. तो केवळ लग्नविधीशीच जोडला गेला नाही, तर भारतीय परंपरेत लग्न म्हणजे सायुज्यता, मीलन. मूळ धातू 'लग्' आहे. लग् म्हणजे चिकटणे, जोडणे. लग्न हे भावी पती पत्नीचे असते तसे जिवाशिवाचेही असते. खरंतर लग्नात परस्परांची हीच सायुज्यता अभिप्रेत असते. ही अंतिम परिपक्वताच म्हणायची. तो या प्रवासाचा अखेरचा टप्पा. त्यापूर्वीचा प्रवास हा पूर्ण आयुष्याचाच प्रवास. दोघांचाही. इथे हा शब्द अर्थातच त्या नादाने प्रकटलेला नाही. पण तरीही यात कवीच्या लाडक्या लेकीच्या विकासाचा लग्न हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कवितेच्या शेवटी सूचित होतेच. 'नव्या क्षितीजी हा नवा सूर्य येई' ही अखेरची ओळ सांगते की लग्नाने तिची गोष्ट संपलेली नाही. तर ती नव्या रंगाने नव्या क्षितीजावर पुन्हा सुरू होईल. त्यासाठीच आहे हे उद्याचे लग्न.

'उद्या लग्न आहे' या ओळीतील दुसरा शब्द ध्वनित होतो तो उद्या. त्याला अर्थाची सुरेख किणकिण आहे. लेकीच्या पायातले चाळ रुणझुणावे अशी. उद्या म्हणजे केवळ आजनंतरचा दिवस नाही. आज कधी उद्याला स्पर्श करू शकत नाही. पण त्यात वर्तमानाच्या भूतभविष्याचेही रंग मिसळून तो एका विराट प्रवाहाचा थेंब होऊनच समोर येतो.

उद्या लाडाकोडानं वाढवलेली लेक सासरी जायचीय. या हुशार, बुद्धिमान लेकीचे जन्मापासूनचे सारे विभ्रम तिचा पिता टिपतो आणि या पित्याचे मन या कवितेत व्यक्त होत राहते. मुलीच्या लग्नाशी, तिच्या उमलण्याशी, घडण्याशी जोडलेले आईचे मन नेहमीच काव्याचा विषय होत आलेय. पण इथे पित्याचे अंतःकरण ज्या तऱ्हेने स्वतःला मोकळे करू जाते ते सारे फार मनोहर आहे. भारतीय पातळीवर कथेच्या संदर्भात पुरुषांच्या मानसिकतेचा वेगवेगळ्या पातळीवर शोध घेतला गेला. 'The Muffled Heart' या शीर्षकाने त्याचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. हाच शोध कवितेच्या पातळीवर कुणी घेतला, तर श्री अरुण मोहरीरांच्या या दीर्घकवितेचा उल्लेख अटळ असेल. कालची अल्लड, अजाण, आग्रही, हट्टी, सदा प्रश्न डोळ्यात घेऊन उभी असलेली आपली पोर उद्या लग्नाला उभी राहतेय हा सगळा पीळ, ताण 'उद्या' या एका शब्दात सामावतो. आपला जोडीदार आपणच निवडण्याइतकी ती मोठी झाली तरी केव्हा, हे आईवडिलांना कळतच नाही आणि एकेक धागा, एकेक पदर उलगडत जातो.

आजी, आजोबा, आई, बाबा यांच्या आश्वस्त जगात गुरफटलेली मुलगी हळूहळू भवतीचे जग जाणून घेत घडत जाते आणि मोठी होते. या पार्श्वभूमीवर उभे राहिलेले उद्याचे लग्न. एवढा दीर्घ कालपट या कवितेत येतो. म्हणायला तो एक वैयक्त्तिक अनुबंधच. पण तो ज्या तऱ्हेने व्यक्त होतो ते सारे ताण तुमचे, आमचे, साऱ्यांचेच आहेत, हे जाणवते. आपण त्या जागी स्वतःलाच पाहायला लागतो. आपल्याच मुलीच्या साऱ्या खाणाखुणा आपण त्यात शोधू जातो आणि मग या साऱ्या प्रवासाला एक दीर्घकवितेचे परिमाण लाभते. असे स्वतःच्या उत्कट, निखळ आशयाचे मग ते एक अथांग सरोवरच होऊन जाते. मग सहजपणेच या कवितेत कवीचे स्वतःचे म्हणून असे खास शब्द येतात:

'चला संथवू रात्र अपुऱ्या बळानी'

'संथवू' हे क्रियापदाचे रूप ही नवकवितेची देण आहे. इथे ते आतूनच यावे असे आले आहे. ही नवीनता ज्ञानेश्वरांपासूनची आहे. ज्ञानेश्वरही 'परिणमले', 'अनुवादलो' असं म्हणतात. मर्ढेकरांनी या शैलीला आधुनिक मराठी कवितेत रुजवले. 'संथवू' असे क्रियापदाचे रूप भाषेला एक लालित्य व गोडवा देतात. रात्र संथ व्हावी असं का वाटतं? तर उद्याचा उगवणारा दिवस निदान काही घटकांनी तरी दूर राहावा. तितकीच लेक आपल्याजवळ राहील. मग मिळालेल्या निवांत घटिकांत एक करता येईल;

'चला वल्हवू नाव उगमाकडे ही
चला सांगू काळा, जरा वाट पाही'

नाव अशी उगमाकडे जाताना केवळ लेकीचंच मोठं होणं नाही दिसत तर तिच्याबरोबर आपली, पूर्ण घराचीच पावलं दिसायला लागतात. मुलं नी मुली असा भेद त्यांनी मुलीला वाढवताना केलाच नाही.

'कुठे भेद होतो सुरू कोण जाणे
असे मूळ त्याचे पुराणे कुराणे'

अशा भेदरहित मोकळ्या श्वासानं लेक मोठी होत जाते. तिला तिची भाषा येते. आईच्या चिऊकाऊच्या गोष्टींनी तिची भाषा वृद्धिंगत तर होतेच पण तिच्या बालमनावर नकळत संस्कार पण होतात. ह्या गोष्टी म्हणजे 'असे पाचवा वेद हा, बालवेद' अशी मार्मिक ओळ मग सहजच येते. ती मग 'संस्कृतीची गणाधीश' भाषाच जणू असते.

मुलगी शाळेत जाते तेव्हा आईशी जोडलेली तिची अदृश्य नाळच जणू पडते.

'तिच्या विश्वविस्तारप्रारंभ रोजी
जणू खंडते नाळ अदृश्य दूजी'

मातृभाषेबरोबरच हिंदीही तिला येतं, पण इंग्रजी जास्त सोपं वाटतं. व्यक्त करायला सुलभ जातं. पण तिला सर्वाधिक आवडते ती गणिताची भाषा. त्या भाषेला 'भाषुली' असा लाडिक शब्द इथे येतो. तो सारं बोलून जातो.

मुलगी मोठी होत जाते तसे तिला खूप प्रश्न पडतात. तिचं जग बदलतं. मित्रमैत्रिणींच, पुस्तकांचं जग होतं. रामायणाच्या कथेनं तिला प्रश्न पडतात. त्याची उत्तरं शोधावी वाटतात. देवधर्म, कर्मकांड, उपचारविधी यात दडलेला सत्त्वांश शोधावासा वाटतो. ते प्रश्नबाह्य वाटत नाही.

उच्चशिक्षणात मुलांपेक्षा मुलींची संख्या खूपच कमी पाहून;

'कशी ही व्यवस्था जिथे भेद आहे
कशी पायरी ही जिला छेद आहे
कशी पौर्णिमा अष्टमी आज होते
कशी संगमीची नदी लुप्त होते'

असा तिला प्रश्न पडतो. भेदाभेद पाहून तिला महाभारत जास्त जवळचे वाटते.

'सदोषा अपूर्णा जिथे नाही दोष
खरे मानवी पात्र, त्या चंद्रवेश'

असे महाभारत तिला जाणून घ््यावेसे वाटते. तिला वाटतं;

'असे हाट हा, मूल्य घ््यावी स्वतःची'

असं हे महाभारत. इथे हाट हा शब्द फार सुरेख प्रतीत होतो. प्राचीन, ग्रामीण मातीत मळलेला हा शब्द इथे नवाच होऊन झळाळतो.

ती मोठी होते.

'अता ओढती वृक्षमूळे जलास'

कसे बाल्य गेले ते आईवडिलांना कळतच नाही आणि हे सांगताना एक सुंदर ओळ येते;

'पुन्हा रंगमंची दिवे जाती, येती'

आणि आयुष्याच्या़ रंगमंचावर उद्याचे लग्न उंबऱ्यावर येऊन राहते.

परक्याघरी जाण्यापूर्वी तिच्या आईशी झालेला तिचा संवाद फार उत्कट आहे. तो वृथा भाष्य करीत नाही. तो अनुभवच मूर्त करतो.

'नको कोरडे मेघ, जलदायिनी तू'

आजची अल्लड, अवखळ मुलगी उद्या क्षणात विरून जाणाऱ्या कोरड्या मेघांसारखी नसणारच. ती उद्याची धीरगंभीर जलदायिनीच असणार. तिनं गावं, माणसं जोडायची, दोन बिंदू जुळवायचे, एकसंघ संस्कृती उभी करायची. नदीच्या तीरावर गावं वसतात, नदी सुकली की गावं उठतात. ही मुलीची जबाबदारी मायलेकीच्या मूक संवादातून उमटते आणि मुलगी लग्नाला उभी राहते. या लग्नाने

'इथे संपते फक्त आकाश एक'

पण

'नसे एक आकाश, पल्याड एक'.

अशी नव्या आकाशाला सामोरी जाणारी ही लग्नकथा. ही मात्र बंदिस्त अशा भुजंगप्रयात वृत्तात लिहिली गेली. संत रामदासांनी मनाच्या श्लोकात हे वृत्त घेतले. दऱ्याखोरी, माळरानं, मैदानं अनिकेत होऊन चालताना मनाशी केलेल्या संवादाचे हे वृत्त इथे श्री मोहरीरांनाही आपले वाटले. त्यांचा आतील स्रोत, अंतरीचा उद्गार हा भुजंगप्रयाताचाच आकार घेऊन आला आणि त्यावर लेखकाचं काही चाललं नाही असंही झालं असेल. पण स्वतः कवीलाही या वृत्ताचे काच जाणवले असले पाहिजेत, म्हणूनच शेवटी ओळी येतात, मुलीला सांगितले जाते -

'नको चालीरीतींची बंदी बनू तू
भुजंगप्रयाती नको बद्ध हो तू'

कवितेतल्या मुक्त आशयाला तशीच मुक्तछंदातली लय हवी होती. आतले गर्भित सौंदर्य विशेष निखरले असते. ओघ स्वाभाविक राहिला असता. डोंगरकपारीतून उगम पावलेल्या झऱ्याची हळूहळू उद्याची खळाळती, क्वचित खोल, गंभीर नदी झाली असती. जिच्यात उद्याच्या जलदायिनीच्याच खुणा दिसल्या असत्या. कदाचित ही दीर्घकविता ही कवीची सुरुवातच असेल. अजून त्यांना त्यांचा ओघ मिळेलही. त्याकरिता श्री अरुण मोहरीर यांना शुभेच्छा आणि लेकीच्या लग्नालाही अर्थात्.

आशा बगे
भ्रमणध्वनि: ७७०९००१७७९
arwindasha@gmail.com

_____________________


आशीर्वच

चि. अरुणच्या मुलीचे लग्न जमले आहे. त्या निमित्ताने त्याने काव्यही केले आहे. ते श्लोकबद्ध आहे. हे ऐकून नवल वाटले. श्लोक - मनाला केलेला उपदेश. उपदेश केलेला कोणालाही आवडत नाही. हे शाश्वत सत्य जाणून रामदासांनी आपल्या मनालाच 'हे मना, बा मना, मना सज्जना' इत्यादी शब्दांनी गोंजारून केलेला उपदेश जगाला दिव्य बोध ठरला. कन्या सासरी निघाली ह्या विचाराने व्याकुळ झालेल्या अरुणने आपल्या मनाचे समाधान कोणत्या शब्दाने केले असेल, ते झाले का, असे प्रश्न मनात उद्भवले.

चि. अरुणच्या मुलीचे लग्न जमल्याचे कळले. आनंद झाला. त्यानंतर काही दिवसातच चि. अरुणचे काव्यगायन आमच्या घरी बंगलोरला झाले. कार्यक्रम छोटेखानीच, पण छान झाला. अभिप्रायही छान पडले. 'उद्या लग्न आहे' ह्या कल्पनेने मनात उठलेले काहूर, भावनांचा कल्लोळ (ह्याला दुःख म्हणता येणार नाही) इतका उत्स्फूर्त ठरला की त्यातून ह्या काव्याचा जन्म झाला. हे काव्य आईच्या नावावर खपविले तरी तो कल्लोळ पितृह्रदयाचा आहे. आणि त्या एकाच गोष्टीमुळे अरुणचे मोठेपण हे ज्ञानेश्वरांच्या पंगतीला गेले. २१-२२ वर्षांच्या अविवाहित तरुण संन्यास्याला जगाने माऊली मानले ते त्यांच्या जगावर मातेप्रमाणे केलेल्या प्रेमामुळेच.

डाॅ. अरुण मोहरीरचा जन्म २५-११-१९५३ चा असून त्याला ३ भाऊ व तीन बहिणी आहेत (डोळे विस्फारले गेले ना?). ते सर्व उच्चविद्याविभूषित आहेत. वडील भाऊ प्रमोद M. Sc., M. Tech., Ph. D. भटनागर अवार्ड विजेता. बहिणींनाही गोल्ड मेडल आहे. आमच्या घरावर शारदा देवीचा वरदहस्त आहे. प्रत्येकाने शाळेत असतांना पहिल्या नंबरवरचा हक्क सोडला नाही. निबंधलेखन, वादविवाद स्पर्धा, समयस्फूर्त भाषण, पाठांतर स्पर्धा यांत बक्षीसे मिळविली. पण काव्य हा प्रांत असा आहे की त्यासाठी मनाची जडणघडण अलगच असावी लागते. भाषेवरचे प्रभुत्त्व, अफाट शब्दसंपदेतून मोजक्या शब्दांचा योग्य त्या ठिकाणी सार्थ उपयोग करणे ही अद्भुत कलाच आहे. केमिकल इंजिनियरिंग सारख्या रुक्ष विषयात १७व्या वर्षापासून ६०व्या वर्षापर्यंत पोहोचलेल्या अरुणने हे केव्हा संपादन केले हे एक आश्चर्यच आहे.

पुष्कळ वर्षांपूर्वी 'संत तुकाराम' सिनेमा पाहिला होता. त्यात मंबाजीचा मुलगा 'बाबा, स्फूर्ती आली, स्फूर्ती आली' असे ओरडतो. हा एक सीन. दुसरा सीन म्हणजे तुकाराम अभंग लिहीत असताना पांडुरंग त्यावर प्रकाशाचा झोत टाकतो. अरुणच्या बाबतीत असेच काहीसे झाले असावे. देवी शारदेने प्रसन्न होऊन हे दान त्याला दिले असावे. त्याशिवाय अशा अनोळखी विषयावर असे उत्कट काव्य निर्माण होणे कठिणच.

चि. अरुणला दोन मुली, शरयू व मंजिरी. त्याचे दोन्ही मुलींवर खूप प्रेम आहे.

पहिल्याच ओळीत त्याने काळाला थांबवून मागे वळून पाहिले आणि त्याचे भावकमल उमलले. आपल्यात असा समज आहे की वेळू (बांबू) ला ६० वर्षांनी फुलं येतात. तसेच त्याचे भावविश्व फुलून आले आहे. वागीश्वरी शारदेने विद्येचे दालन तर खुले केले होतेच. त्यातच हे कवितेचे दालनही खुले केले आहे. शारदेच्या मंदिराच्या अनेक दालनात त्याचा प्रवेश असाच सुगम व सफल व्हावा ही इश्वरचरणी प्रार्थना.

मी अरुणची आई. यमधर्माच्या राजवाड्याच्या ९० व्या पायरीवर उभी आहे. दरवाजा अजून बंद आहे. बाकीच्या काव्याचे रसग्रहण करणे मला शक्य नाही. त्याच्या काव्यात उपमा किती, अलंकार किती, उत्प्रेक्षा किती, याचे मला ज्ञान नाही. इतक्या हुशार मुलांना आशीर्वाद देणे माझ्या शक्तीबाहेर आहे. म्हणून आमची कुलस्वामिनी जगदंबा व वाग्विलासिनी शारदेने त्याला असेच अनंत आशिर्वचनाने उपकृत करावे एवढीच इच्छा. शुभं भवतु! ज्ञानेश्वर माऊलींच्या 'जो जे वांछील, तो ते लाहो' या शब्दांवर मीही थांबते.

प्रमिला सदाशिव मोहरीर
२२-११-२०१३

_____________________



मनोगत

केवळ स्वानंदासाठी लिहिलेली 'उद्या लग्न आहे' ही माझी दीर्घकविता प्रकाशित होत आहे. हा एक योगायोगच आहे. मुलीच्या लग्नाचे निमित्त होऊन बरेच वर्षांपासून डब्बाबंद असलेली आपली 'ट ला ट, री ला री' कला बाहेर काढावी अशी इच्छा झाली. पाळण्यापासून बोहल्यापर्यंतचा आजच्या मुलीचा प्रवास शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करावा व त्या योगे आनंदमुरब्बा चाखावा हा हेतू. आप्तेष्टांच्या लग्नकार्यात मंगलाष्टके जुळविण्याचा, तसेच शाळेत स्पर्धांमध्ये आपल्या मुलींसाठी ३-४ कडव्यांच्या कविता करण्यांचा थोडाफार अनुभव होता. वरवधू व त्यांच्या आईवडिलांची नावे, लग्नतिथी, इष्ट घटी, पळे, स्थळ आदी शार्दूलविक्रीडितच्या साच्यात बसवायची सवय होती. लहानपणी आजोळी संध्याकाळी बंगईवर बसून आम्हा बहिणभावांनी म्हटलेल्या मनाच्या श्लोकांची चाल डोक्यात होती. शाब्दिक कोट्या करायची सवय तर लहानपणचीच. माझ्या कोटी करण्याच्या सवयीवर सवाई कोटी करून माझा मोठा भाऊ प्रमोद मला कोट्याधीश म्हणायचा. काहीही थातुरमातुर केले तरी आपले लोक आपले कौतुक करतात याची खात्री होती. सर्वच जुळून आले आणि ही कविता घडली.

मुंबईच्या आय. आय. टी. मध्ये गेली २७ वर्षे  मी रासायनिक अभियांत्रिकी सारखा नीरस विषय अरसिकांना शिकवीत आहे. कठीण गोष्टी उदाहरणाद्वारे सुबोध भाषेत सांगण्याची कला समोर विद्यार्थी आले की आपोआपच साध्य होते. रूक्ष विषयावरील व्याख्यानात विनोदाचे महत्त्व कळायला लागते. चांगला शिक्षक हा पिंडाने कीर्तनकार असावा लागतो. हे मला प्रत्ययाने पटले. लहानपणी वाती न वळता ऐकलेल्या कीर्तनांचाही नकळत फायदा झाला. दोनदा मिळालेल्या 'उत्तम शिक्षक' पुरस्काराने व शिक्षकी हा आमचा जणू काय खानदानी पेशा असल्यामुळे मी ह्या व्यवसायात पूर्णपणे अडकून पडलो. व्यवसायातून नाही तरी व्यावसायिक चढाओढीतून निवृत्त झाल्यामुळे स्वतःचा असा थोडाफार निवांत वेळ मिळायला लागला. आठवणींचा रवंथ तर फावल्या वेळी सुरूच असतो. 'चला सारू कामा, बसू या निवांत । चला लोटू ताटा, करू या रवंथ ।' ह्या कवितेतील दोन ओळीत व्यक्त मनस्थितीत ही कविता घडली.

छंदबद्ध कविता करायला कठिण, पण माझ्या फार आवडीची. गणवृत्ते, मात्रावृत्ते, य र त न भ ज स म, य म्हणजे ल गु गु, भुजंगप्रयातचे गण य य य य, वगैरे ज्ञान शाळेत नववीच्या वर्गात जे मनात ठसले ते कधीच पुसले गेले नाही. नववी-दहावीत शाळेत मला बाबांनीच मराठी शिकविले. बाबा म्हणजे माझे वडील सदाशिव मोरेश्वर मोहरीर. वृत्तदोष अक्षम्य, ऱ्हस्वदीर्घाच्या चुका फक्त कवितेतच क्षम्य, असे ते सांगत. प्रसिद्ध कवींच्या कवितांची उदाहरणे देत. त्या ज्ञानाचा इतक्या वर्षांनी उपयोग झाला. वृत्तनिष्ठतेमुळे ऱ्हस्वदीर्घाच्या चुका आहेत असे वाटणे साहजिक आहे. त्या खटकतीलही. पण जसे छापले तसेच वाचले तर मनाच्या श्लोकांची चाल सहजच येईल. पूर्ण कविता करून होईपर्यंत माझे मन शाळेत, बाबांच्या वर्गात होते. 'उद्या लग्न आहे' चे स्फूर्तिस्थान बाबाच आहेत.

करुणरस असो वा वीररस, आध्यात्मिक कविता असो वा गझल, आपल्या भिन्न चालींनी भुजंगप्रयात वृत्त त्यांना न्याय करते. कवितेचे दीर्घत्व तसेही मुक्तछंदाला साजेसे नाही. कविता पूर्ण होईपर्यंत मी पूर्ण भुजंगप्रयाती झालो होतो. एखाद्या गोष्टीचा 'छंद' लागणे म्हणजे काय हे अनुभवाने कळले. कविता हातावेगळी झाली आणि मीच 'छंदमुक्त' वा 'मुक्तछंद' झालो.

कविता ठरवून करता येत नाही. ती घडते. स्थळ, काळ, वेळेचे बंधन ती पाळत नाही. बरीचशी कविता प्रवासात, व्याख्यान दौऱ्यांवर, ट्रेडमिलवर धावतांना, मुंबईत कुठल्या ना कुठल्या रांगेत उभे असताना, कुठलाही कार्यक्रम सुरू होण्याची प्रतीक्षा करताना सुचली. कधी तिकिटावर, कधी वर्तमानपत्रावर, कधी रसीदीवर, कधी किराण्याच्या यादीवर, तर कधी तळहातावर ती उमटली. कधी दिवसाकाठी दहा कडवे निघाले, तर कधी दहा दिवसात एखादे. जसे जसे सुचले, जे काही सुचले त्याचे रात्री घरी वाचन झाले. पूर्ण कविता होईपर्यंत ५-६ महिने गेले. संपूर्ण कवितेचे सलग वाचन माजघरातच झाले. असे खाजगी प्रयोग तीन चार झाले. श्रोत्यांकडून मला अभिप्रेत नसलेले अर्थ पुढे आले. कवितेत कुठे कुठे काव्य असण्याचाच तो पुरावा.

अशाच एका दुपारी मुंबईला माझा भाऊ विश्राम ह्याला मी पूर्ण कविता वाचून दाखविली. त्याला ती आवडली. ती माजघरातून व्यासपीठावर जावी असे त्याचे मत पडले. त्याच्याच पुढाकाराने पुढे नागपूरला त्याच्या घरी जाणकार निमंत्रितांपुढे वाचन झाले. दुसऱ्याच दिवशी माझी बहिण वृंदा हिच्या घरी वाचन झाले. पहिल्यांदाच त्रयस्थांची, तसेच काही साहित्यिकांची प्रतिक्रिया कळली. माझ्या दोन बहिणी, गीता व विजया, मराठीच्या विद्वान आहेत. त्यांचे मत व सूचना आवर्जून घेतल्या. कुठेतरी तरीही अपूर्णता जाणवत होती. शेवटी बंगलोरला व्याख्यानानिमित्त जाण्याचा योग आला. माझा लहान भाऊ सुधीर याच्या घरी कवितावाचन केले. जेमतेम सहा श्रोते. पण त्यात आई होती. आईचे वाचन, पाठांतर, रामायण महाभारताचे सखोल ज्ञान आश्चर्यचकित करणारे आहे. तिला कविता आवडली. 'काशीची गंगा रामेश्वर'ला टाकल्याचे समाधान मिळाले.

सुरुवातीच्या बुजत बुजत टाकलेल्या पावलांनी खूपच आत्मविश्वास दिला. मनाची तयारी झाली. विश्राम व स्वाती घारपुरे यांच्या प्रयत्नांनी विदर्भ साहित्य संघाच्या व्यासपीठावर नागपुरात पहिले जाहीर कवितावाचन झाले. सौ. आशा बगे, सौ. वीणा देव व इतर बरेचसे साहित्यिक, कवी उपस्थित होते. कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद, सर्वच उपस्थितांचे उत्साहवर्धक अभिप्राय पाहून कविता पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचे धाडस करण्याचे ठरले.

छोटे मोठे आणखीही कार्यक्रम झाले. प्रत्येक ठिकाणीच अनपेक्षित अर्थ व सूचना समोर आल्या. कुणी पुस्तकाच्या १०० प्रती मुलीच्या लग्नात भेट म्हणून द्यायला मागितल्या, तर कुणी मुलीच्या हळदीच्या दिवशी कवितावाचन कराल का असे विचारले. कुणी कवितेतला आईचा मुलीला उपदेश रुखवंतावरील सप्तपदीदर्शक सात पावलांवर लिहायला परवानगी मागितली. कुणाला कविता आपल्यावरच रचली आहे असे वाटले, तर कुणाला शनीचेे सात चंद्र आईला दाखवून आईवर कुरघोडी करणारी मुलीची खोडी भावली. कुणी कार्यक्रमात टिश्यू पेपर द्यावे असे सुचविले. एका भगिनीने मुलाच्या आईच्या अवस्थेवर कविता लिहावी असे सुचविले. कां असे विचारता 'अहो मुलीच्या आईची घालमेल व गळ्यात दाटणारा आवंढा जितका खरा, तितकाच सून येणार ह्या विचाराने मुलाच्या आईच्या पोटात उठणारा गोळाही खराच'.... एकंदरीत काय, कविता घडली!

हस्तलिखितापासून प्रकाशित पुस्तकापर्यंतच्या प्रवासात बऱ्याच जणांचे हात लागले. सौ. आशाताई बगे यांची प्रस्तावना पुस्तकाचा अविभाज्य अंग आहे. आपल्याच कवितेवर भाष्य करणे मी येथे मुद्दामच टाळतो. तशीही कविता फार दुर्बोध नाही. कवितेला अर्थ रसिकांनीच द्यायचा असतो. कविता वाचून कविता वाचनाला उपस्थित राहून आपले कवितेविषयी प्रांजळ मत मांडल्याबद्दल आशाताई व वीणाताई ह्या दोघींचे मानावे तितके आभार कमीच आहेत. घरचे कार्य समजून घरच्यांनी न सांगता पडेल तो कार्यभाग उचलून घेतला. त्यांची ही कळकळ मुलीच्या लग्नात खूपच कामी येईल. त्या सर्वांना वन्समोऽऽर!

तीर्थरूप आईने आशीर्वादपर स्वहस्ते दोन पाने लिहून पाठवली. ती एकही शब्द इकडचा तिकडे न करता समाविष्ट केली आहेत.

तीर्थरूप आई व बाबांना पुस्तक समर्पित करतो व रसिकांच्या हाती देतो.

अरुण सदाशिव मोहरीर
केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंट
आय. आय. टी. बाँम्बे
पवई, मुंबई - ४०००७६

Email: amoharir@iitb.ac.in

२५-११-२०१३

_____________________


उद्या लग्न आहे


उद्या लग्न आहे, उरी श्वास दाटे
उरी श्वास घेता गळा सर्प घोटे
गळा मुक्त होता, जिव्हा शुष्क वाटे
मुखी पाणि घेता नद्या चक्षुवाटे ।।१।।

चला थोपवू काळ काही पळांनी
चला संथवू रात्र अपुऱ्या बळानी
चला हात जोडू महासारथ्याला
चला थांबवू सूर्य अरुणोदयाला

नदी काळ आहे, दिशा एक जाणे
उद्या आज होणे, उद्या आज होणे
वळूनी पहाणे, जरा संथ होणे
न त्याच्या पुराणे, न त्याच्या कुराणे

मनाचे तसे नाहि, विपरीत आहे
तया बांध नाही, न त्या बंध आहे
दिशा वक्र त्याची, गती चक्र आहे
उद्या आज नाही, उद्या आज आहे

घड्याळास काटे, गती धर्म त्यांचा
न शांती क्षणाची, सुगावा उद्याचा
तया शीर्षि रुतुनी बसे काळराजा
म्हणे तू पुढे जा, पुढे जा, पुढे जा ।।५।।

मनासी न घेणे न देणे तयाशी
मनाची जडे भक्ति त्या लंबकाशी
सदा पाळणा आठव कल्पनांचा
सदा मार्ग मागे पुढे पाउलांचा

असे भिन्नवृत्ती, असे भिन्नकर्मी
असे भिन्नचित्ती, असे भिन्नधर्मी
असे मंडपी आज ही त्यांचि स्पर्धा
चला थांबु, पाहू क्षण एक अर्धा

नवा काळ येतो, जुना काळ जातो
कसा काळ जातो, कसा काळ जातो
कधी येइ, पाडी घरे काळजा तो
कधी येइ, आनंदवी काळजा तो

चला सारु कामा, बसू या निवांत
चला लोटु ताटा, करू या रवंथ
चला वल्हवू नाव उगमाकडे ही
चला सांगु काळा, जरा वाट पाही

किती काळ गेला, किती खेळ झाला
कुणी बाद झाला, कुणी आत आला
हु तूू तू तु तू तू कधी श्वास गेला
मि तू तू मि तू तू किती वाद झाला ।।१०।।

कधी मंद वारा, कधी शुक्रतारा
कधी उष्ण वारा, कधी थंड गारा
कधी थाप पाठी, कधी मार पोटी
कधी हार माळा, कधी हार गाठी

कधी काळ गोरा, कधी काळ काळा
कधी नेइ थोरा, कधी देइ बाळा
कधी सावली तो, कधी ऊन होई
तयाची महत्ता कुणी काय गाई

करो काळ होई जशी त्याचि इच्छा
मनाची गती थोर, पुरवील पिच्छा
मनाच्या भरारीस बुद्धीचि साथ
नसे काळ निर्बुद्ध, देईल साथ

मनाच्या मनी हार आहे अमान्य
मनाला नसे बेडि काळाचि मान्य
मनाच्या मनी आज विद्रोह आहे
मना मागुनी दोर ओढीत आहे

चला आज काळास घालू लगाम
तया ठोकु बेड्या, न मानू गुमान
चला आज काढा करू आठवांचा
चढो रंग हळदीस पिवळा तयाचा ।।१५।।

मुले जन्म घेती, मुली जन्म घेती
प्रसूतीविधी भेद दावीत नाही
असे बाळ, बेबी नऊ मास पोटी
तिथे भेद तो, ती निसर्गात नाही

रडे तो, रडे ती, पडे थाप पाठी
हसे तो, हसे ती, असे होत नाही
निसर्गाचि आज्ञा शिरोधार्य सर्वां
करे तो शु, ती शी, असे होत नाही

भुकेपोटि कल्लोळ दोन्ही जिवांचा
असे अमृती हक्क चिमण्या द्वयाचा
तिला दूध, त्याला दही ताक द्याया
धजे ना कुणी जोवरी जागि माया

जरी जन्मवेळेचि मानू महत्ता
जरी मानु तारे ग्रहांचीच सत्ता
तरी कायदा काय होईल ऐसा?
मुली येति रात्री, मुले फक्त दिवसा?

कुठे भेद होतो सुरू कोण जाणे
असे मूळ त्याचे पुराणे कुराणे
असो, आपणा काहि घेणे न देणे
चला भेदु भेदास, पाडू उताणे ।।२०।।

जगी येउनी दोन दिवसांचि झाली
वये वाढते जैसि वेली नवेली
असे दुप्टिने कालपेक्षा वयाने
उद्या जाय, परवा पुन्हा दुप्पटीने

कुणाच्या मते जैसि आई दिसे ती
कुणा खात्रि बापाचि प्रतिमा दुजी ती
कुणा नाक वाटे अती धारधार
कुणा खात्रि त्या जागि उल्काप्रहार

कुणा वाटती चीनि जापानि डोळे
कुणा केस सरळी, कुणा केस कुरळे
नसे अर्थ, ही व्यर्थ सारी चिकित्सा
मला झोपु द्या, जा, अशी बालइच्छा

सग्यांची बघ््यांची किती गर्दि झाली
घरी प्राणि येता घरा जाग आली
घरी पाळणा हालता जीव डोले
तिच्या मर्जिने विश्व हे सर्व चाले

नसे नाव ठेवावया वाव काही
तिला हाक मारावया नाव नाही
चिऊ सोनु पिल्लू मनू बुल्लि बिल्ली
अशी गोड नावे अता फार झाली ।।२५।।

सुरू शोध नामावलीचा यथार्थ
कधी अर्थ नाही, कधी अर्थ द्व्यर्थ
सिता रुक्मिणी रेटती आजिआजे
नको, शोधु ते नाव जे आज साजे

असे प्रश्न गंभीर, त्या नाहि सोड
ठरे नाव ते काय सर्वांस ओढ
तिची माय सांगे तिला नाव कानी
कुणी घेइ गोविंद, गोपाळ कोणी

कसा काय गोविंद उल्लेख आज?
कसा काय गोपाळ उद्धार आज?
तिचे बारसे ते तिचे कां नसावे?
तिने 'ती' नसावे, तिने 'तो' असावे?

असो तीस काही नसे खंत त्याची
तिला होत चिंता तिच्या दूपट्याची
किती थंड ओले, किती काळ झाला
कुठे भाउ गोविंद गोपाळ गेला

किती सूर्य आले, किती सूर्य गेले
निसर्गक्रमाने तिची वाट चाले
दिसू लागले चेहरे स्वच्छ आता
कळू लागले आपुले कोणि येता ।।३०।।

रडावे कधी आणि केंव्हा हसावे
कसे आपुले लाड पुरवून घ््यावे
कसे गुंतवावे, कसे नाचवावे
कुणी नाव घेता कसे 'हो' म्हणावे

कधी पालथी झालि, सरली पुढे ती
कधी रांगली, पायि झाली उभी ती
जसा काळ चाले, पुढे चालली ती
जशी धाव त्याची, तशी धावली ती

कळू लागले तीस शब्दार्थ आता
जमू लागले शब्द स्मरणी चिऊच्या
वळेना परी जीभ, ना शब्द ओठी
जमू लागले मेघ, ना होत वृष्टी

नसे शब्द ओठी, परी भाव आहे
जरी वात नाही तरी ज्योत आहे
तिचे बोलती दोन डोळे जगाशी
न जे साध्य शब्दात इतरा जनांसी

कळू लागले रंगसाम्राज्य आता
खळी गालि ये लाल दृष्टीस येता
नको शुभ्र काळे, हवे लाल नीळे
तिच्या रंग विश्वास सूर्योदयाचा ।।३५।।

नको मोगरा, फूल जास्वंद आता
फुग्यांचे थवे रंगिबेरंगि हाता
नको कावळा, मिठ्ठु मैनेशि मैत्री
भरे रंग सौंदर्य ती कल्पचित्री

कळू लागले सूर संगीत आता
जरी अर्थ नाही, कळे चाल आता
कधी सूर बेसूर होता जरासा
कशी नाक मुरडी चिमुरडी अताशा

जगी श्रेष्ठ संगीत अंगाइगीत
तिच्यावीण ना झोप बाईस येत
तिची माय गाता तिला झोप येई
कधी बाप गाता तिची झोप जाई

कळू लागले गंध नाना तऱ्हेचे
कळ्यांचे फुलांचे, नव्याचे जुन्याचे
दुधाचे दह्याचे, छिछी औषधाचे
मऊ भात नी घास काऊ चिऊचे

अशा रंग सुर गंध विश्वात आली
नऊमासिची कैद पडद्यात गेली
न चिंता उद्याची, स्वविश्वात राहे
जगी सर्व सूखी अशी तीच आहे ।।४०।।

जमू लागले मोति तोंडात आता
वळू लागली जीभ त्यांना पहाता
तयांची बसे पंक्ति कार्यानुरूप
ध्वनीला मनीच्या मिळे शब्दरूप

निघू लागले बोबडे बोल आता
निघे वाक्यरचना पहाता पहाता
जणू ग्रंथ होता कधीचाच तेथे
प्रकाशन तयाचे असे होत आता

असे शास्त्र भाषा, असे शस्त्र भाषा
असे जात भाषा, असे गोत्र भाषा
असे प्रेम भाषा, असे वैर भाषा
असे संस्कृतीची गणाधीश भाषा

असे देव भाषा, असे धर्म भाषा
असे शक्ति भाषा, असे युक्ति भाषा
असे व्याघ्र भाषा, असे गाय भाषा
असे माय भाषा, अशी मायभाषा

नका देउ काही मुलींना मुलांना
नका देउ सोने न नाणे तयांना
नका सोडु मागे घरे, शेतिभाती
तयां ज्ञान द्या, द्या तयां शब्दशक्ती ।।४५।।

जसे पीक मागे मृदा, योग्य वेळ
ऋतू शब्दशेतीस हा बाल्यकाळ
नका सोडु ही संधि, पेरा बियाणे
निगा राखुनी पीक घ््या पूर्ण आणे

जसे बोबडे बोल ओठात येती
तशी सज्ज आई, सुरू शब्दशेती
न माने कळीला कधी ती लहान
सदा साधि संवाद प्रौढासमान

सुरू गोष्ट गंभीर काऊ चिऊची
किती अर्थ, ती गोष्ट मार्मीकतेची
न शेणाचि मेणाचि वा पावसाची
गरीबी, श्रिमंती, न काऊ चिऊची

असे गोष्ट ही ज्या न आदी न अंत
असे वेद हा पाचवा, बालवेद
असे सूक्त जे भेद घेई मनीचा
असे बीज जे वृक्ष हो संस्कृतीचा

अशा ह्या कथा बालवेदी अगण्य
कधी वाघ कोल्हा, कधी पापपुण्य
कधी राणिराजा, कधी राजपुत्र
असे द्रौपदीचे जणू बुद्धिपात्र ।।५०।।

अशी वेदशाळा तिची नित्य चाले
तिची बुद्धि भाषा पुढे वाट चाले
तिच्या कल्पनाशक्तिला धार येई
तिला दावणीचा अता भार होई

अता दावणी दोर निर्बंध वाटे
अता वर्तुळाची सिमा फार दाटे
अता विश्व बाहेरचे साद देई
नभी पक्षिणी ही अता झेप घेई

इथे संपतो अंक एक प्रवेशी
इथे घेत माघार सीमा नि वेशी
इथे येतसे पायवाटेस मोड
इथे येत दाण्यास उन्मेष मोड

अता ही कळी फूल होण्यास पाही
अता ही अळी कोश फोडून येई
भरे कोण वेगास पंखात त्याच्या
अता सज्ज ती वेध घेण्या नभाचा

निघे बाल हनुमान गिळण्यास सूर्या
अनारी बळे सारते मोह माया
तिच्या कारणे होतसे पुत्रडंका
तिचे धैर्य जाळी सुवर्णाचि लंका ।।५५।।

तिला पाठशाळेत जाण्याचि घाई
नव्या उत्सवाच्या तयारीत आई
तिचे पाटिदप्तर, तिचा खाउडब्बा
तिच्या मिरवणी ती, तिचे आइबाबा

किती ऐटिने ती वरातीत चाले
कधी येइ शाळा असे तीस झाले
तिच्या कल्पनी पिंपळी कावळ्यांची
भरे रोज शाळा, तशी आज तीची

थवेचे थवे आज शाळेस येती
मुली येति, गोविंद गोपाळ येती
तिच्या एवढे अन्य पाहून तेथे
तिला मौज वाटे, मनी थोडि भीती

जशी होत घंटी, तसे आइबाबा
तिला सोडुनी आत, बाहेर येती
तिच्यासारखे अन्य, ती आणि बाई
नसे मान्य शाळा, जिथे नाहि आई

कुणी मुसमुसे, आसवे गाळि कोणी
तिला ना कळे कां गळा काढि कोणी
तिला आवडे बाइची गोष्ट गाणे
तिचे बोलणे चालणे, पप्पि घेणे ।।६०।।

तिला आत सोडूनि बाहेर दक्ष
कशी पक्षिणी ठेवि एकाक्ष लक्ष
तिच्या काळजी काळजी फार दाटे
कधी होइ सुट्टी असे तीस वाटे

अशी तूट दोघींचि, ऐसी प्रतिक्षा
सले अंतरी अंतराची हि शिक्षा
तिच्यावाचुनी तीस वाटे अपूर्ण
चला घंटि झाली, सजा आज पूर्ण

म्हणा कोणि शाळा, म्हणा पाठशाळा
म्हणा कोणि काही, जणू बंदिशाळा
जसे पिल्लु बाहेर येई सुटून
तसे चारही नेत्र येती भरून

अशा भावनांनी अशा चिंब ओल्या
दिनी मास आषाढिच्या ह्या पहील्या
तिच्या विश्वविस्तारप्रारंभ रोजी
जणू खंडते नाळ अदृष्य दूजी

तिच्या आइला बाइची साथ आता
तिचे एकछत्री न साम्राज्य आता
पडे अंतरी एक कप्पा स्वतंत्र
जिथे बाइचे राज्य नी तंत्र मंत्र ।।६५।।

कसा लांघतो काळ आषाढटप्पे
कशी बुद्धिची दालने आणि कप्पे
हळू उघडुनी त्यात विद्या विराजे
कला जीस चौसष्ट, विनयेन साजे

अ आ ई इ आता तिच्या पाटि आले
तयांशी तिचा नित्य संवाद चाले
अ आणि इ जाता उरे फक्त आई
अशी जादु होता तिला मौज येई

उ ऊ येति रांगेत, औ अं अः ही
तिला गुदगुल्या होति हासे हि ही ही
स्वराव्यंजनांची जशी फौज आली
तिच्या पाटि त्यांची बघा दाटि झाली

तिला गर्दिमध्ये दिसे आइ, बाबा
कधी ताइ भाऊ, कधी बाइ आबा
कधी मावशी आजि, नाव स्वतःचे
तिच्या स्वप्नि हो तांडवनृत्य त्यांचे

कधी पाठि आई, लिही पाटि बाबा
कधी पाटि आई लिही, पाठि बाबा
कधी कोणि अभ्यास घेवो न घेवो
कधी बाइ अभ्यास देवो न देवो ।।७०।।

जणू अक्षरांशी जडे प्रेम तीचे
तया नीट सजवी जसे बाळ तीचे
तया बाळसे, डौल, बांधा बघूनी
मनी हर्षते त्यांचि ही बाल जननी

तिची ना सुटे पाटि पेन्सील आता
तिच्या अक्षरा रूप सौंदर्य आता
तिची आणि त्यांची असे खास मैत्री
तिची पाटि वाटे जशी चैत्रगौरी

पुढे अक्षरांचा जसा जोड होई
तिच्या विस्मयाला नसे ठाव काही
जसे शब्दब्रह्मांड निर्माण होई
जिभेला तिच्या खूप व्यायाम होई

कळेना तिला काय गीतेत उक्ती
खजीनाच जोडाक्षरांचा जणू ती
तिचे श्लोक डोक्यात, उच्चार ओठी
जसे येत पाटी, मनू होत मोठी

जशी अक्षरे जन्म शब्दास देती
तशी व्याक्रणाची तया नित्य भीती
नसे शब्दस्वातंत्र्य शब्दास येथे
उभे राहती वाक्य सांगेल तेथे ।।७५।।

कशी अक्षरे चोख एकत्र येती
कसे शब्द होती, कसा अर्थ घेती
कशा शब्दपंक्ती कसे काव्य होती
विचारास शक्ती, कणा, धार देती

अता वाक्यरचना तिला साध्य होई
अता रीत भाषेचि लक्षात येई
अता मांडु लागे मनीचे विचार
अता भांडु लागे, जणू झालि थोर

तिला वाचनाची अता गोडि लागे
नव्या पुस्तकाची तिला ओढ लागे
नवे येइपर्यंत पारायणे ती
जुन्यांची करी, ती जणू काय पोथी

चढे ए बि सी च्या अता पायऱ्या ती
तिला इंग्रजीची मुळी नाहि भीती
जशी अक्षरे, शब्द, वाक्ये कळाली
तिला आंग्ल भाषेचिही गोडि आली

इथे मूळ दुष्काळ मूळाक्षरांचा
इथे खेळ सव्वीस, ना बावनांचा
इथे होय जोडाक्षरांना मनाई
मराठी असे इंग्रजीवर सवाई ।।८०।।

तिचा दोन्हि भाषांत होई सराव
अता इंग्रजीचा तिला होइ गर्व
मराठीमधे मागुनी ना मिळावे
तिथे इंग्रजी 'प्लीज' चा जोर लावे

जरी भिन्न भाषा, जरी भिन्न रीती
असे साम्य कार्यी, नदी ही, नदी ती
विचारी मनाच्या विचारप्रवाहा
मुळापासुनी सागरा मार्ग देती

विचारांचि गंगोत्रि भाषाच आहे
विचारांचि आईहि भाषाच आहे
विचारांचि प्रगतीहि भाषाच आहे
विचारांचि मंडीहि भाषाच आहे

जशा दोन भाषा तिला येत आता
गती येत प्रगतीस शालेय आता
तिला वाचनाची क्षुधा भूक नित्य
जणू पोट डोकी, कृमी वास त्यात

अता पुस्तकांची तिला फार गोडी
जशी वाढ तीची, तशी त्यांचि जाडी
कधी जेवतांना नसे लक्ष पानी
सदा हाति पुस्तक, असे लक्ष पानी ।।८५।।

असो पंचपक्वान्न, कंदर्प झुणका
कधी गद्य चटणी, कधी पद्य फुरका
वडाभात पुरणाचि द्या मेजवानी
तिच्या पुस्तकी गोष्ट राजा नि राणी

कधी मायभाषा, कधी आंग्लभाषा
अता त्या मिळे तीजि जी राष्ट्रभाषा
जरी अक्षरे तीच, भाषा निराळी
मराठी न हिंदी, कशी ही नव्हाळी

तिला ना कळे गौडबंगाल कैसे
इथे हो, तिथे हाँ, कसे होत कैसे
कधी साम्य वाटे, कधी भिन्न रूपी
मराठीत गोविंद, हिंदीत गोपी

जरा काळ जाई, नसे जाण पूर्ण
न हिंदीत पूर्ण, मराठी अपूर्ण
तिला आत्मविश्वास ये इंग्रजीत
कळे ना कळे, आंग्लभाषेचि जीत

तिन्ही नांगरे मातिला उलथवीती
बिजा ऊब देती, नवे रूप देती
विचारी मनी चालते नित्य शेती
बिजा शुद्ध पोटी फळे गोमटी ती ।।९०।।

अता भाषणे वादसंवाद नित्य
निबंधी कधी वा कधी काव्यबद्ध
तिचे शब्दकौशल्य येई वयात
पडे शर्करा जी विचारी दुधात

त्रिभाषेस आता मिळे एक भाषा
नव्हे मातृ, ना आंग्ल, ना राष्ट्रभाषा
नसे बोलभाषा, असे तोलभाषा
म्हणा अंकभाषा, म्हणा मोलभाषा

दहा अंक मूळाक्षरे ऐसि भाषा
किती छोटि भाषा, तिच्या बोटि भाषा
कशी छोटुली सानुली बाहुली ही
जणू बाकि भाषा, असे भाषुली ही

असे नाव या भाषुलीचे गणीत
हिच्या व्याक्रणाची निराळीच रीत
जरी अक्षरे मोजकी, शब्दनंत
जशी अक्षरे हाति हाता धरीत

कधी अंकबेरीज विश्वास ग्रासी
वजाबाकिने सर्व जाई लयासी
गुणाकारि साकारते विश्वरूप
अभागी असे भाग हा कंसरूप ।।९५।।

तिला ना खपे एक गणितात चूक
सदा शंभरी शंभराचीच भूक
तिच्या लेखि नव्व्याण्णवा मूल्य शून्य
गणीतेश्वरा ही तिची भक्ति मान्य

गणीतामुळे वेग प्रगतीस येई
त्रिभाषेचि त्या जोड कामास येई
अशा चार भाषा, असे स्तंभ चार
अता पेलती भौतिकी वास्तुभार

खगोली कसा गोल तेजाळ तप्त
जया अंत प्रारंभ लागू न होत
कसे फेकले दूर प्रत्यंग त्याने
कशी तोडली नाळ नाही तयाने

कुणी गुंफिली सूर्यमाला कशास
कसा येतसे जीव पृथ्वीतलास
कुणी पृथ्विचा मोजला व्यास त्रिज्या
विना पंख आकाशि चंद्राचि मज्जा

कसा चंद्रमामा, घरी कां न ये तो
दुरूनी पहातो, कधी सुट्टि घेतो
कसा सूर्य वेळेवरी रोज येतो
तशी शिस्त मामास लावील का तो ।।१००।।

कुणी सांगती होय आकाशि गंगा
तिच्या पुस्तकी चित्र आकाशगंगा
तिला ती कधीही कुठेही दिसेना
म्हणे आइ, हट्टी मुलां ती दिसेना

जशी बाइ सांगे शनीचे स्वरूप
कसा चंद्र त्या एक नाही अनेक
तिच्या बालबुद्धीत घे जन्म खोडी
म्हणे, आइ ये पाहु जम्मत जमाडी

तिला अंगणी नेइ, आकाशि बोट
शनी दावि, मोजे तया चंद्र सात
म्हणे आइ, कैसे मला बा दिसेना
म्हणे, दुष्ट जे भूवरी त्या दिसेना

खगोली भुगोली रहस्ये महान
तिच्या वाचनी ती, जरी ती लहान
सदा प्रश्न हे कां, असे कां, तसे कां
तिला ना कळे राग थोरांस ये कां

तिच्या प्रश्नचिन्हास नाही विराम
कसे थोर ज्ञानी, अरे राम राम
न कामाचि आई, न कामाचि बाई
तिची पुस्तके, मित्र, ती भाइ भाई ।।१०५।।

अशी दूरि येई, नको बाइ आई
अता वादसंवाद मित्रांत होई
जणू प्रश्नस्फोटे रवी तप्त झाला
पुन्हा अंगप्रत्यंग विच्छेद झाला

जणू रंगमंची नवे दृष्य येई
घडे बालिका धावता नायिका ही
झणी पुस्तकाची पुढे जात पाने
फिरे वर्तुळी तासकाटा गतीने

अता ज्ञानप्राप्तीस गांभीर्य येई
सरे कोवळे ऊन, माध्यान्ह होई
अता कूपमंडूक बाहेरि येई
पुढे पाहुनी सागरा थक्क होई

अता पाटि गेली, वही आलि हाती
न चित्रे, न तक्ते, पुढे जाड पोथी
अता ज्ञान सारांश, संक्षिप्त नाही
अता विस्तृतीला नवा वाव येई

अता खेळ नाही, मुळी वेळ नाही
अता काळ कामास वेगाचि घाई
अता पायथ्यागोरसाचे प्रमेय
कधी सिद्ध नाही, कधी साध्य होय ।।११०।।

कसा प्राणवायूविना प्राणि नाही
कशा लक्ष योनी, कसे लाख प्राणी
कशी क्रांति उत्क्रांति हो वानराची
कसे बुद्धिचे ज्ञान ह्या मानवासी

असो डायनासोर वा जंतु कोणी
निसर्गापुढे काय त्यांची कहाणी
समुद्री जसा थेंब, वा वाळवंटी
कणाला जशी गण्यता, तीच त्यांची

असे क्षुल्लकास्तित्व घेऊनि आला
परी बुद्धिज्ञाने मिळे राज्य त्याला
कळू लागले गूढ त्याला जगाचे
असे शोध जे ध्यानि ना जे मनीचे

सदा शोधगाथेमधे मग्न राही
मनी मानसी शोध लावीत राही
तिला खंत कां ती नसे भूतकाळी
तिला नेइ मागे अशी कां न गोळी

तिला आवडे गोष्ट झाडाफळाची
तिथे झोपलेल्या महामानवाची
कसा वृक्ष ढाळी फळा त्याच भाळी
कसा शोध जो सत्य राहे त्रिकाळी ।।११५।।

तिथे कोणि सामान्य पांथस्थ होता
कपाळावरी गोल टेंगूळ ये त्या
कशी न्यूटनाला अशी बुद्धि होई
गुरुत्वाचि व्याख्या पुढे ज्ञान नेई

नसे तोड विज्ञान ज्ञानास काही
तिच्या कल्पनी तीहि शास्त्रज्ञ होई
अता बंडखोरी तिच्या ठायि येई
पुरावा न ज्या ते कसे सत्य होई

अती जाहता भौतिकीची गणीते
अती गुंतता भूमितीची प्रमेये
अती वाढता भार पाठांतराचा
तिला आवडे पाठ रामायणाचा

तिला लागली गोडि रामायणाची
अयोध्याधिशाची नि शरयूतिराची
कसे एक बाबा, तरी तीन आया
कशी रीत ही सख्खि सावत्र माया

कसा यज्ञ, अग्नि, प्रसादाचि वाटी
कशी पक्षिणी ओढि जो घास ताटी
कशी जाइ आकाशि, दे अंजनीला
कसा पुत्र गुंडा तिच्या ये कुशीला ।।१२०।।

कशा वाटती पायसा तीन राण्या
कशा भिन्न त्यांच्या रिती नी कहाण्या
कसे राम सौमित्र जाती वनास
कशी जात सीता द्वया सोबतीस

तिला आवडे रामसीता विवाह
कशी कैकयी माय दुष्टस्वभाव
तिलाही दिसेना शनी, चंद्र सात
हसे आठवूनी स्वखोडी मनात

तिला ना गमे लग्न ही गोष्ट काय
तिला ना कळे शाप उःशाप काय
अहल्या शिळा राघवे मुक्त केली
परी ती शिळा कां, कुणी, कैसि केली

कथा ऐकता ऐकता घेइ बाजू
घडे चांगल्या वांगल्याचा तराजू
कुणी ना म्हणे ती तरी रामपाठी
दहातोंडि येता कपाळास आठी

तिला आवडे मारुती बंडखोर
करी त्याचि सेना समुद्रास पार
कसा जाळि लंका सुवर्णाचि साफ
कसा शोधि सीता अशोकी वनात ।।१२५।।

तिला आवडे कुंभकर्णाचि झोप
कशी त्याचि आई न टोके तयास
म्हणे होइ माझी जशी ही परीक्षा
तशी ज्यास्त झोपेन त्याच्याहि पेक्षा

जसा आडवा रावणी देह झाला
जसा राम येई अयोध्या घराला
तिला वाटले सूख येई सितेला
रडे, रूप येई पुढे जे कथेला

तिला ना कळे कां सितेची परीक्षा
तिला ना कळे कां सितेलाच शिक्षा
सितादिव्य आणी तिच्या नेत्रि पाणी
कशी ही कहाणी, नको ही कहाणी

तिची गोडि पाहून रामायणाची
पुढे येति आज्या तिला घडविण्यासी
तिला घालती झूल धार्मीकतेची
व्रतांची, पुजांची, जपांची, तपांची

तिला सांगती देव नी दैव काय
कधी काहि ना होत नियतीशिवाय
कसे मंत्रसामर्थ्य सर्वांस भारी
कसे ज्ञानविज्ञान मायाच सारी । ।।१३०।।

कसे अंधविश्वासही ज्ञानजन्य
कसे घोर अज्ञान सर्वांस मान्य
कसे मानवा हाति काहीहि नाही
कसे भाळिचे भाग्य पूर्णास जाई

कसे देवअस्तित्त्व हे प्रश्नबाह्य
तया मानणेची असे धर्मग्राह्य
असा प्रश्न उच्चारणे हेचि पाप
जयाचा उतारा असे देव बाप

सदा भीति देवाचि आशा कृपेची
सदा फूल वाहून आशा फळाची
सदा भोग नैवेद्य एका कणाचा
स्वतःला हवी नित्य भेली गुळाची

कसा सोवळ्या ओवळ्याचा विटाळ
चतुर्थी उपासी किती हा फराळ
कसे सोंग, हा घोळ अवडंबराचा
कसे दर्शनी जे मनी ना स्वतःच्या

कसे श्लोक पारायणांचे महत्त्व
कुणी कां न त्या अर्थ जाणून घेत
कसा दंभ थोतांड हे कर्मकांड
किती व्यर्थ ही बुद्धिची हेळसांड ।।१३५।।

कसे जेवती, दक्षिणा घेति, जाती
कसे पुण्यबाजारि व्यापारि येती
कशी पोटि भीती, कशी भूल देती
कसे कावळे पिंडस्पर्शास येती

तिला ना कळे, ना वळे हे कधीही
कधी हात जोडी, कधी ती नसेही
तिने जाणले वाद हा व्यर्थ आहे
तिच्या मार्गि ती आज निश्चिंत आहे

व्रते आणि वैकल्य वैफल्य आणी
असे ज्ञान सर्वोपरी हेचि जाणी
तिला खंत नाही टिका टिप्पणीची
तिने टाकली कात प्राचीनतेची

पुढे जाइ ती त्याच विज्ञान मार्गी
कसे शोध, विख्यात शास्त्रज्ञ, योगी
सदा मांडती सत्य जे सत्य होते
किती क्लेश धर्मांध देती तयाते

परी सत्य ना झाकुनी फार राही
कधी ना कधी ते उफाळून येई
फिरू लागली पृथ्वि, हो सूर्य जागी
असे देव तो, शक्ति तो, तोच योगी ।।१४०।।

तिचे शास्त्र विज्ञान, शास्त्रज्ञ देव
न ते मागती भोग, ना वैश्वदेव
तया होमकुंडी नको तेल तूप
पुढे न्या प्रमेये अपेक्षानुरूप

अणू, रेणु, धातू, अधातू अताशा
ध्वनी, चुंबकी शक्ति, वीज,  प्रकाशा
कशी ही प्रकाशाचि स्पर्धा ध्वनीशी
जणू दैवि खेळी ससा कासवाची

किती योजने लक्ष एका पळात
सदा जात सूर्यप्रकाशू नभात
कसा आठ मिनिटात येई धरेस
दिरंगाइ ना घाइ, थेट प्रवास

जसे सोडवी हे खगोली गणीत
गुणे काळ वेगास, ये उत्तरास
किती दूर हा सूर्य पृथ्वीस ऐसे
कळे, नेत्र विस्फारती, सूर्य जैसे

अशी एक नाही गणीते कितीक
निसर्गाचि सत्ये पुढे एक एक
जणू देव प्रत्येक शोधात आहे
नसे स्वर्गि तो, तो निसर्गात आहे ।।१४५।।

अशा देवपूजेत ती दंग राही
तिच्या धर्मग्रंथात ती मग्न राही
सरे काळ वेगे, जणू तो प्रकाश
मनू विश्वविद्यालयी घे प्रवेश

असे विश्वविद्यालयी विश्व भिन्न
इथे शिस्तिची ना कुठे खूण, चिन्ह
इथे ना भरे रोज शाळा सकाळी
इथे ना फुटे पाटि निश्चीत काळी

इथे फार दुष्काळ हो मैत्रिणींचा
इथे झुंडि गोविंद गोपाळ यांच्या
कशी उच्च शिक्षा, मुलांनाच दीक्षा
कशी चुंबकाच्या धृवाची उपेक्षा

कशी ही व्यवस्था जिथे भेद आहे
कशी पायरी ही जिला छेद आहे
कशी पौर्णिमा अष्टमी आज होते
कशी संगमीची नदी लुप्त होते

कसा एक हाती नमस्कार होतो
कसा सूर्य माध्यान्हि माघार घेतो
कसा व्यास त्रिज्येत संपून जातो
जगा ह्या अभंगी कसा भंग येतो ।।१५०।।

किती प्रश्न ज्या साथ ना उत्तराची
किती उत्तरे जोड ज्या ना खऱ्याची
खरे जे दिसे विश्वि ते योग्य नाही
मनी खंत ही नित्य, ज्या अंत नाही

अशी ही मनाची अवस्था सदाची
अशी ही व्यथा भोवताली जगाची
जुडी ज्ञानविज्ञान अज्ञान ह्यांची
मनःप्रांगणी गर्दि नाना छटांची

नसे शुभ्र काळे तिचे विश्व आता
भरू लागले रंग आता पहाता
मतां व्यक्तिमत्त्वां अता धार येई
महाभारता अंतरी पाट देई

महाभारती व्यास ना गोष्ट सांगे
नसे ती कहाणी, पुराणात वांगे
नसे युद्ध ते पांडव कौरवांचे
असे द्वंद्व ते मानवी मानकांचे

नसे त्या महाभारती कोणि श्रेष्ठ
नसे पूर्ण देवत्त्व, वा दानवत्त्व
सदोषां अपूर्णां तिथे नाहि दोष
खरे मानवी पात्र, त्या चन्द्रवेश ।।१५५।।

असे हा उहापोह नाना विचारी
जया जे पटे ते मनी तो उतारी
नसे राजमुद्रा, न आज्ञा नृपाची
असे हाट हा, मूल्यं घ््यावी स्वतःची

जशी व्हावि पारायणे ह्या कथेची
तशा अर्थलाटा फुटाव्या तटाशी
कथा तीच, ते व्यास, ना पात्र भिन्न
दही भात लिंबू नवे नित्य अन्न

जसा आवडे पाठ रामायणाचा
तसा आज मेवा महाभारताचा
जरी राजपुत्रांचि राजांचि गोष्ट
तरी ह्या कथेला कणा द्रौपदीचा

जशी छाप शास्त्रज्ञ पाडूनि जाती
तशी द्रौपदी आणि संपूर्ण क्रांती
महातेज शक्ती महाभारताची
जणू होतसे पुंजि अर्ध्या जगाची

सितादिव्य आणी जसे नेत्रि पाणी
कथा द्रौपदीची तिला राग आणी
मनी होत गर्दी किती भावनांची
व्यथा, वेदना आणि संवेदनांची ।।१६०।।

कुरुक्षेत्रिचे युद्ध नाही गदांचे
धनू बाण भाले रथी सारथींचे
तिथे संपले युद्ध अष्टादशीला
मनी मानवी नित्य चाले घडीला

महाभारताचे महापात्र कर्ण
करी त्याचि कुंठा मनाला विदीर्ण
तळे व्यासनिर्मीत, पिल्ले कुरूप
तयामाजि हा राजहंसास्वरूप

सदा ज्ञान, विज्ञान, साहित्य ग्रंथ
सदा मित्र, चर्चा, कला, काव्यअर्थ
जसा वाहतो काळ काळासमान
तसे रोपटे होइ वृक्षासमान

अता ओढती वृक्षमूळे जलास
नको द्यावया झारिने पाणि त्यास
नको छत्र डोक्यावरी, सूर्य भाळी
स्वतः देतसे सावली थंड काळी

स्वयंभू अता ना धरे बोट आई
स्वतः वादळी जाउनी बोट येई
नको वक्रदृष्टीकडे लक्ष व्यर्थ
नको दृष्ट काढावया, ती समर्थ ।।१६५।।

अता बुद्धिला ये विवेकी किनारा
प्रवाही नदीला तटाचा इशारा
नको बंध मोडू, न होई तटस्थ
नको लक्ष्मणाची, स्वतः आखि रेख

महत्ता समाजाचि देशाचि काय
तिचे नागरी हक्क, कर्त्तव्य काय
कशी संस्कृती बांधते राष्ट्र एक
जरी प्रकृती, व्यक्ति होती अनेक

कसा रक्तवर्णी गतःकाळ काळा
कसे धर्म जे मागती मुंडमाळा
कसे धुंद बेधुंद सत्तांध राजे
कसा माज जो वाकवी मान लाजे

असो ज्ञान विज्ञान वा मानवीकी
असो पद्य प्राचीन, गद्ये नवी की
असो भौतिकी, सांख्यिकी, हे कि, ते की
असे सर्वभक्षी बकासूर ती की

असे पुस्तकांची सदा देवघेव
मनी लेखकांची सदा येवजाव
कुणी शब्दलोहार, शब्दास धार
कुणी शब्दसोनार, छेडी सतार ।।१७०।।

किती व्यक्ति वल्ली, नवे हे विचार
कधी नीतिमूल्ये, कधी बोध चार
कधी गूढ कादंबरी, प्रेमगाथा
जशी येथ होते सुरू एक आता

पुनः रंगमंची दिवे जाति, येती
घड्याळात काट्यांचि होई फजीती
पहा नायिकेचा पुढे येत साथी
अकस्मात वाद्यध्वनी कर्णि येती

समक्षी पुढे सोबती दोन जीव
पहा आंगठ्यांची अता देवघेव
टिळा भाळि, आम्ही तुम्ही साक्ष आज
द्वया अंतरी भाव दृकश्राव्य आज

तिच्या जे मनीचे, तिला होइ प्राप्त
म्हणे माय गब्बाइगब्बाइ तृप्त
नसे गाठ ही बाहुला बाहुलीची
तिच्या काळजी काळजी त्या घडीची

कधी वाळुयंत्रास का स्थैर्य आले?
कधी धबधब्याला कुणी बांध घाले?
कसे बाल्य गेले, किती वर्ष झाले
कसा काळ गेला, उद्या लग्न आले ।।१७५।।

पतंगीत आनंद आकाशि स्वैर
परंतू हवी नित्य हातात दोर
जशी उंच जाई, मना हर्ष देई
परी ती असे माझि, हा भाव राही

जशी कागदी नाव ओढ्यात सोडी
तशी ती पुढे जाइ, पाण्यास ओढी
तिच्या त्या गतीने मना हर्ष होई
वियोगे स्वनिर्मीति हो कष्टि आई

जसा काळ जाई, तसा धीर येई
मनाची तयारी अनायास होई
अता लग्नकार्यास प्रारूप येई
उद्याच्या तयारीस आरंभ होई

जशी जोडि साधी, असो लग्न तैसे
कशाला हवी घोडि, बाजे, तमाशे
खुशीला नसे मोल ही गोष्ट मान्य
मिळे ती न बाजारि हा अर्थ अन्य

यथाकाळ आराखडा पूर्ण होई
सविस्तार, येथे न संक्षिप्त काही
जराशा चुकीने अता घाम येई
मनी, स्वप्नि, लग्नाविना गोष्ट नाही ।।१८०।।

पुढे काळ जाई, नसे लग्न दूर
असे रात्र थोडी, परी सोंग फार
पहाता पहाता उद्या लग्न आले
पुनः एकदा आइचे धैर्य गेले

मनीच्या पिशाच्च्या पुनः जाग आली
मनी प्रश्न, काहूर, गात्रे गळाली
पुनः सांगु गीता, उठा वेळ झाली
घरी पाहुण्यांची बघा गर्दि झाली

तिचा कृष्ण सांगे तिला आज गीता
मनाला मनाचीच हो साथ आता
गतःकाळी ने तू मनःमारुताला
'अहो' शी तुझे लग्न हो ज्या घडीला

तुझी जी स्थिती, आइची तीच तेंव्हा
नसे काळ हा, वेगळी रीत तेंव्हा
मुलाची मुलीची नसे पूर्वभेट
असे रूढिचा दाट दोघात पाट

तया पूर्विचा काळ त्याहून भिन्न
तरी आइची भावना तीच खिन्न
तुझ्या पोटची पोर होईल आई
तिच्या पोटची पोर लग्नास येई ।।१८५।।

जसा काळ जाई,  तसे ज्ञान येई
पिढीजात रूढी नवे रूप घेई
नसे लग्न रूढी, असे मैत्रि आता
नको दान देऊ स्वकन्येस माता

उद्या मैत्रिचा तू समारंभ मानी
नव्या ओळखीचा शुभारंभ मानी
इथे योग जाणी, नसे हा वियोग
तुझी तीच राणी, तिला राजयोग

नको भावनांना जुन्या देउ थारा
पुढे काळ गेला, नवा आज वारा
तुझ्या मैत्रिणीचे उद्या होत लग्न
तुझी आइची कात टाकी सुलग्न

तिचा कृष्ण सांगे स्वतःलाच गीता
मनाला मिळे शांति किंचीत आता
पुनः ती उद्याच्या तयारीत गर्क
करी राणिसाठी उपदेश अर्क

नको गंजु, त्याऐवजी जा झिजून
नको वाचवू कष्ट, जा तू थकून
नको साठवू शब्द, घे तू वदून
कशाला उद्या आज हो जे करून ।।१९०।।

नको संथ होऊ, नको संत होऊ
नको रुद्ध होऊ, नको वृद्ध होऊ
नको जिद्द सोडू, नको हार मानू
स्तुतीच्या फुलांना नको हार मानू

नको देव होऊ, नको दैव मानू
अकर्मण्यतेला नको शिस्त मानू
चुकीच्या भयाने नको यत्न टाळू
पटे ना मना जी, नको रीत पाळू

नको काजवा, संथशी ज्योत हो तू
नको वीज आकाशिची, चांदणी तू
नको कोरड्या भावना, चिंब हो तू
नको कोरडे मेघ, जलदायिनी तू

नको तेच ते, रोज नाविन्य आण
असे एक आयुष्य हे मर्म जाण
नको चालिरीतींचि बंदी बनू तू
भुजंगप्रयाती नको बद्ध हो तू

नको हात जोडू, नको ओठि मंत्र
नको हात सोडू, ज्ञ तू तंत्र यंत्र
नको कुंजरोवा नरोवा म्हणू तू
नको शब्दजंजाळ, मुद्यास ये तू ।।१९५।।

नको रांग मोडू, नको रांग सोडू
नको हक्क मारू, नको हक्क सोडू
नको मित्र सोडू, नको शत्रु जोडू
नको स्वार्थपोटी कधी हात जोडू

नको अश्रु ढाळू, नको अश्रु टाळू
जिथे सूर्य आहे, नको तेल जाळू
नको जात पाळू, नको पात पाळू
जिथे न्याय नाही, नको खेळ खेळू

तुला योग्य वाटे तसे तू करावे
नको अंधश्रद्धा जिथे ना पुरावे
सदा माझिये शब्द ऐकून घ््यावे
पटे ते धरावे, पटे ना पुरावे

असो सत्यसामर्थ्य पाठीशि नित्य
पडो कष्टसाफल्य झोळीत नित्य
असो जिद्द ध्येयास गाठावयाची
जशी ध्येयप्राप्ती, नवे ध्येय दत्त

यशेच्छा, शुभेच्छा, मनेच्छा, सदिच्छा
क्रिया जोवरी नाहि, त्या हो फुकाच्या
हजारो व्रतांचे, जपांचे, तपांचे
नसे काहि सामर्थ्य, जे चळवळीचे ।।२००।।

प्रयत्ने जरी वाळु ना तेल देई
प्रयत्नाविना घास ना तोंडि येई
प्रयत्नास बुद्धीची हो साथ जेथे
वळे स्वर्गगंगा धरेमाजि तेथे

कपाळी असो गंध वा हाति धागा
धरी हात हातावरी तो अभागा
धरी हाति जो फावडे, घाम गाळी
असे स्वर्णहांडा तयाच्या कपाळी

नको खेळ येथे वृथा भावनांचा
बसो मेळ येथे पृथा सावल्यांचा
नसे व्यासभाकीत ज्या भारताते
घडो ते जसे पाहिजे तू नि त्याते

किती आवळा मूठ वाळूचि घट्ट
तरी काळ वाळू झरे नित्य दुष्ट
अता ह्या मुठीमाजि काहीहि नाही
रथामाजि आरूढ सूर्यास घाई

इथे संपते फक्त आकाश एक
नसे एक आकाश, पल्याड एक
नव्या क्षीतिजी हा नवा सूर्य येई
तया स्वागता सज्ज ही साश्रु आई ।।२०५।।


नव्या आकाशाच्या नव्या क्षितीजावर, नवोदित सूर्याच्या साक्षीने, अंतरपाटाच्या दोन बाजूस वर वधु हाती हार घेऊन उभे राहतात. डाव्या तळहातावर मंगल अक्षता घेऊन, त्यातल्याच काही उजव्या चिमटीत धरून गुणिजन उभे राहतात. आईच्या भावनांचा आदर करून शेवटी कालचक्र सुद्धा जरासे थांबते. निसर्ग प्रसन्न होतो आणि साऱ्या आसमंतात मंगल ध्वनी दरवळतो:

पृथ्वी, आप नि तेज, वायु जमले, आकाश हा मांडव
धर्मी, शूर, सुहास्य, सुंदर असे आले तुम्ही पांडव
पाषाणी, जळि, काष्ठि आणि स्थळि ह्या वर्षावती अक्षता
थांबूनी जणु कालचक्र वदते, कुर्यात सदा मंगलम्

_____________________

No comments:

Post a Comment